Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे विचार

व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे विचार
माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचा ४३ वा स्थापनादिन संपन्न





पुणे, ५ ऑगस्ट : " शिक्षणाचा प्रचार व प्रसार करत असताना त्याचे प्रयोजन काय आहे, हा चिंतनाचा मुद्दा आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू व्यक्ती असून त्याचा सर्वांगीण विकास हेच मुख्य प्रयोजन असावे." असे विचार श्रुतिसागर आश्रम फुलगाव चे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचा ४३ व्या स्थापनादिनाच्या समारंभात मुख्य पाहुणे म्हणून ते बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख होते. तसेच गरीबे इन्स्टिट्यूट फॉर सॉफ्ट पॉवर अँड पब्लिक डिप्लोमसी यूएसचे संस्थापक आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रा. फर्नांडो गरिबे , गरिबे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रोनाल्ड सी. गुनेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, विश्वस्त व सचिव प्रा. स्वाती कराड - चाटे, विश्वस्त डॉ. विनायक घैसास, एमआयटी डब्ल्यूपीयू चे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. संजय उपाध्ये लिखित आणि प्रा. शशांक दिवेकर प्रस्तुत "गीत विश्वनाथ, विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा: यात्रा वचनपूर्तीची" हा कार्यक्रम झाला.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले, "शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा, बुद्धीचा आणि मनाचा विकास झाला तर सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील. मनाची मशागत करणारी मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती आवश्यक असून व्यक्तिमत्वाचा विकास हेच खरे शिक्षण ठरू शकेल"
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले," मूल्याधिष्ठित नागरिक घडावा या विचारातून ही शिक्षण संस्था कार्यरत आहे. अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातून जगात शांती नांदेल. विश्वशांती साठी मानवतावादाचे वैश्विक सिद्धांत विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे."
प्रा. फर्नांडो गरिबे म्हणाले, "सध्याचे जग जिथे विसंगती आणि मतभेदांना तोंड देत आहे. अशावेळी आंतरिक ज्ञानाचा शोध घेणे हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबर आंतरिक ज्ञानाचा शोध घ्यावा व वैश्विक मानवता जागवावी."
संजय देशमुख म्हणाले, " विश्वशांतीचा मंत्र देणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदानातून विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखविला आहे. ही शिक्षणसंस्था पसायदानाचा वैश्विक विचार शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये रुजविण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे.
 माईर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी दृकश्राव्य माध्यमातून संस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला.
यानंतर माईर्स शिक्षण संस्था समूहातील विविध शाखांमधील उल्लेखनीय सेवा देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून जागतिक स्तरावर केलेल्या रचनात्मक कार्यासाठी माईर्स शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष व विश्वस्त डॉ. सुनिल कराड यांना गोल्डन हॉल ऑफ फेम अवॉर्ड मोस्ट प्रिव्हियस ज्वेल्स ऑफ नॉलेज डिवाइन अँड युनिक पर्ल्स ऑफ विस्डम ने सन्मानित करण्यात आले.
 डॉ. मंगेश कराड यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. स्वाती कराड चाटे यांनी आभार मानले व डॉ. रत्नदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 


जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.
Previous Post Next Post