हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला फासावर लटकवू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन...
मुंबई- हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडीतेचा आज सकाळी 6.55 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर महाराष्ट्रात आक्रोश उमटला होता. हिंगणघाटमधील दारोडा गावातील जमाव संतप्त झाला होता. ते नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी करीत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचींही शर्थ केली पण काळाने घाला घातला. हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य आहे. आरोपीला अजिबात दयामाया दाखवली जाणार नाही. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल व खटला जलदगतीने चालविण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला फासावर लटकवू, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. अनेकदा या प्रकरणात न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरू असते. शिक्षा होण्यासही बराच वेळ लागतो. मात्र या प्रकरणात तसं घडू देणार नाही आणि लवकरात लवकर गुन्हा गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.